बॉलिवूड मधला ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता बांधणार पूरग्रस्तांसाठी घरं, कोल्हापुरातील ‘खिद्रापूर’ गाव घेतलं दत्तक

सलमान खान फिल्म्स आणि गुरुग्राम येथील एलान फाउंडेशनने महाराष्ट्रातील पूरग्रस्त गाव खिद्रापूर दत्तक घेतले आहे. या गावातील पूरग्रस्तांसाठी सलमान खान फिल्म्सकडून घरं बांधण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी आलेल्या पुरामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हाहाकार माजला होता.
कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरमध्ये देखील होत्याचं नव्हतं झालं होतं. या पुरामध्ये वाहून गेलेली आणि मोडून पडलेली घरं पुन्हा बांधण्याचा निर्णय सलमान खान याने घेतला आहे. सलमान खान फिल्म्स आणि एलान फाउंडेशनकडून पूरग्रस्त भागात पक्की घरे बांधण्यात येणार आहेत.
तज्ज्ञ, राज्य सरकार, स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच गुंतवणूकदारांच्या सहकार्याने पूरग्रस्त भागात घरबांधणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. संपूर्ण गावाचा व्यापक विकास करण्याचा दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘एक जबाबदार संस्था म्हणून आम्ही ग्रामीण भारतात सकारात्मक बदल घडवून आणण्यास वचनबद्ध आहोत. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग हा भारताचा पाया आहे त्यामुळे हा प्रकल्प अल्पभुधारकांच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी हा छोटासा प्रयत्न आहे.’ अशी प्रतिक्रिया एलान फाउंडेशनचे संचालक रवीश कपूर यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये सहकार्य करण्यासाठी त्यांनी सलमान खानचे आभार देखील मानले आहेत.
‘2019 च्या पुरामध्ये ज्यांनी कुटूंब गमावले माझ्या संवेदना त्यांच्याबरोबर आहेत. अनेकांचं वैयक्तिक नुकसान झालं तर अनेकांना घर देखील गमवावं लागलं आहे. गावातील लोकांचं राहणीमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न आहे’, अशी प्रतिक्रिया सलमान खान याने दिली आहे.
या प्रकल्पासाठी एलान फाउंडेशनने कोल्हापूर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र राज्य प्रशासन यांच्यासमवेत सामंजस्य करार देखील केला आहे. या करारानुसार घरं बांधण्यासाठी आर्थिक संसाधनं आणि आवश्यक श्रमदानाचा पुरवठा एलान फाउंडेशनकडून करण्यात येईल.
प्रशासकीय सहाय्य आणि बांधकामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सात सदस्यीय समितीही स्थापन केली आहे. समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असती. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तांत्रिक सदस्य, जिल्हा दंडाधिकारी, महसूल विभागाचे सदस्य, ग्रामसेवक त्याचप्रमाणे एलान फाउंडेशनचे काही सदस्य या समितीमध्ये असतील. ही समिती बांधकामाचा आढावा घेईल.